आजच्या स्त्री पुढील आव्हाने...
बंदीवान मी या जन्मीची
नारी बनुनी जन्म भूवरी
आजच्या आधुनिक महिलांसमोर तीन आव्हाने म्हणजे, घर नोकरी व इतर जबाबदाऱ्या आहेत. तरीसुद्धा आव्हानांना पेलता पेलता,नवीन आशा पल्लवीत होण्याचे आणि नवीन स्वप्न पाहण्याचे मात्र सोडत नाही. आजची आधुनिक स्त्री म्हणून वावरताना तिच्या समोरची आव्हाने देखील नव्याने निर्माण झाली आहेत. आणि त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ती खंबीरपणे उभी राहून त्यांना पेलण्यासाठी सज्ज झालेली आहे. कधी ती डगमगते तर कधी निराश होते, कधी मनही उदास होते, पण ती हार मात्र मानत नाही..
आजच्या स्त्रिया पुढे आव्हानांची एक वेगळीच मालिका निर्माण झालेली आहे.अन्यायाचा बिमोड कसा करायचा, त्यांना आवर कसा घालायचा.. हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. आणि तोच प्रश्न आजच्या आधुनिक स्त्रीला सुद्धा पडला आहे..
आज कित्येक तरुणी शिक्षणासाठी नोकरीसाठी व करिअरसाठी एकट्या अनोळखी शहरात घरा पासून दूर राहतात. निर्जन रस्त्याने एकटीने जाणे योग्य नसते. हे कळत असूनही पर्याय उपलब्ध नसल्याने वाट काढून जातात. आणि अशाच वेळी तिचा घात होतो. आणि अमानुष कृत्य घडतात. काही गुन्हेगार पकडले जातात. पण नंतर पुरेशा पुराव्या अभावी किंवा तपासातील त्रुटीमुळे लगेच सुटून जातात. अशा विकृत घटना पुन्हा पुन्हा घडत असतात. माझ्या मनाला असा प्रश्न पडतो की बलात्कार करण्याची प्रवृत्ती का फोफावत आहे?याचे पहिले कारण म्हणजे देशात वाढलेल्या भ्रष्टाचार ..बलात्कार केल्यानंतर आपण पकडलो गेलो तरी पोलिसांना मॅनेज करू शकतो. ही मानसिकता अशा गुन्हेगारांची झालेली आहे. त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही. पोलिसांचा वचक राहिलेला नाही. मोठे मोठे गुन्हेगार या प्रकरणातून निर्दोष सुटलेले आहेत. गुन्हा करणाऱ्यांची दहशत आणि आपण फिर्याद करूनही न्याय मिळणार नाही, कोणी मदत करणार नाही. या भीती पोटी अनेक प्रकरणे उघडकीस येत नाही.. आणि म्हणूनच अजूनही मुलींवर व महिलांवर होणारे अत्याचार व बलात्कार थांबले नाहीत उलट वाढतच आहे.काही महिन्यापूर्वी बदलापूर येथे घडलेली घटना असो की नुकतीच पुणे येथे घडलेली स्वारगेट मधील घटना दोन्ही मन सुन्न करणा-या आहेत.
इंटरनेटमुळे समाजात विकृतीचे प्रमाण वाढतच आहे वासना, आकर्षण आणि प्रेमभंगाच्या बदल्याच्या भावनेतून तरुणीचे जीवन संपुष्टात येत आहे. शहर असो किंवा ग्रामीण भाग आजच्या तरुणी कुठेही सुरक्षित नाहीत. मग मनात वारंवार राहून राहून एकच प्रश्न निर्माण होतो याला जबाबदार कोण?
स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक हिंसेच्या घटना आणि प्रसिद्धी माध्यमांमध्ये होणाऱ्या बातम्या यांची आता समाजाला सवय झाली आहे. रोज वर्तमानपत्रात किमान एक तरी विनयभंगाची आणि बलात्काराची बातमी असते. या मानसिकतेला नातेवाईक, शिक्षण, जात, धर्म, असा, कुठलाच स्पष्ट चेहरा नाही. आपल्यातच राहणाऱ्या समाजाचा एक भाग असणाऱ्या पुरुषांचे विचार आणि कृती किती हीन पातळीची आहे या घटनेमधून लक्षात येते...
आजच्या आधुनिक स्त्रियांनी आपल्या संरक्षणाची काळजी स्वतः घ्यावी. कोणी आपल्या मदतीला येईल आणि आपले रक्षण करेल ही भ्रामक कल्पना न करता अन्यायाचा प्रतिकार करायला शिकले पाहिजे. समाजातील एकूण चित्र पाहिले तर आजची स्त्री अद्यापही सुरक्षित नाही एवढे मात्र खरे आहे..
काळ बदलला आणि काळाबरोबर समस्या, आव्हान आणि संघर्षाचे स्वरूपही बदलत चालले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
स्त्री जरी आधुनिक झाली तरी ती विचारांनी आणि बंधनाने मात्र तिथेच आहे. तरीसुद्धा चेहऱ्यावर बेगडी हसू आणून जगत आहे..
"जीवनाची ही लढाई अजून बाकी आहे" असे मनाशी ठरवून ती आव्हानांना सामोरे जात आहे.
वृंदा पगडपल्लीवार
9421720175
0 Comments