निवडणूक लोकसभेची चर्चा मात्र विधानसभेची
लोकसभेच्या निवडणूकीत विधानसभेचीच चर्चा
18 व्या लोकसभेच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. गाड्या, स्पिकर, वॉल पेंटीग, बिल्ले या पारंपारीक प्रचार यंत्रणेला फाटा देत, रिंगणातील भिडूनी आधुनिक प्रचाराला सुरूवात केली आहे. स्पिकर, कार्यालयातील प्रचाराची रणधुमाळी आणि प्रचार सभा अजूनही सुरूवात न झाल्यांने 'माहोल' कुणाचा याचा अंदाज अजूनही मतदाराला आला नाही. लोकसभेच्या निवडणूकीत भाजपाने बल्हारपूर निर्वाचन क्षेत्रातून मागील तीन टर्म आमदार राहीलेले, या मतदार संघाची नेमकी 'नाळ' ओळखलेले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरविले आहे तर, दुसरीकडे कॉंग्रेसने वरोरा—भद्रावतीच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना अखरेच्या क्षणी उमेदवारी दिली आहे. दोनही विद्यमान आमदार दिल्लीच्या वाटेवर असल्यांने, त्यांचे दिल्लीला जाण्याने रिक्त होणार्या आमदारकीवर अनेकांचे लक्ष लागून 'अब मुंबई दूर नही' असे वाटल्यांने इच्छुक भावी आमदारांच्या मनात लड्डू फूटत असल्यांचीच चर्चा आहे.
बल्हारपूर निर्वाचन क्षेत्र मागील जवळपास पस्तीस वर्षापासून भाजपाच्या ताब्यात आहे. अनेकदा या मतदार संघाने कॉंग्रेसला विजयाच्या दारात नेवून अखेरच्या क्षणी हुलकावणी दिली. आता मात्र सुधीर मुनगंटीवार हे लोकसभेच्या रिंगणात असल्यांने, ते दिल्लीत गेले तरच, बल्हारपूरची आमदारकीची जागा रिक्त होवू शकते व इच्छुकांची स्वप्नपूर्ती होवू शकते, यामुळे भाजपाचे इच्छुक मुनगंटीवारांचा प्रचार जीव तोडून करतील मात्र कॉंग्रेसमधील इच्छुकांसमोर 'धर्मसंकट' उभे आहे. मुनगंटीवार यांचे विरोधात 'मनातून' प्रचार केला आणि ते लोकसभेत पराभूत झाले तर, बल्हारपुर विधानसभेत परत तेच उभे राहतील अशावेळी त्यांचे विरोधात निवडूण येणे कठीण असल्यांचे ते खाजगीत बोलत आहे. कॉंग्रेसच्या प्रचारात 'उन्नीस—बीस' केले तर, बल्हारपूरची गादी मिळविणे त्या तुलनेत सोपे असल्यांचेही ते बोलत आहे. त्यामुळे प्रचारात किती सहभागी व्हावे यावर नेत्यांत अडचण निर्माण झाली आहे.
कॉंग्रेसमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश मारकवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद अहिरकर, बल्हारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, राहूल पुगलीया, मागील निवडणूकीत कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले राजू झोडे, अलिकडेच कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या डॉ. अभिलाषा गावतुरे अशी इच्छुकांची भलीमोठी यादी आहे. यातील राहूल पुगलीचा, विनोद अहिरकर, प्रकाश मारकवार, राजू झोडे यांनी यापूर्वीच्या निवडणूकीत आमदारकीसाठी नशिब अजमाविले होते. संतोष रावत यांनी यापूर्वीच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचेकडे बल्हारपूर निर्वाचन क्षेत्रातून उमेदवारीची जाहीर मागणी केली आहे. वंचितमध्ये राहून वेळेवर कॉंग्रेसची उमेदवारीवर दावा केल्यांने राजू झोडे यांना उमेदवारी मिळू शकली नव्हती हा अनुभव लक्षात घेवून डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी आधीच कॉंग्रेसचा दुपट्टा गळ्यात टाकला आहे. या सर्वांना बल्हारपूरची आमदारची खुणावत आहे, मात्र विधानसभेच्या निवडणूकीत सुधीर मुनगंटीवार सारखा तगडा, अनुभवी उमेदवार पुन्हा रिंगणात राहील्यास, अडचण निर्माण होवू शकते याचीही या सर्व इच्छुकांना जाणीव आहे, त्यामुळेच मुनगंटीवार लोकसभेत गेले तरच, आमदारकीचे स्वप्न पूर्ण होवू शकते याचीही त्यांना खात्री आहे. अशावेळी धानोरकर यांचा प्रभावी आणि मनातून प्रचार करून, स्वत:च्या पायावर कुर्हाड मारून घ्यायचे काय? असा प्रश्न अनेक इच्छुकांपुढे असल्यांने ते कॉंग्रेसचा प्रचारात अजूनही मनातून उतरले नाही. मुनगंटीवार लोकसभेत निवडूण गेले तरच बल्हारपूरचे आमदारकीचा मार्ग सुकर होवू शकत असल्यांने कॉंग्रेसमधील इच्छुकांसमोर धर्मसंकट निर्माण झाले आहे.
वरोरा—भद्रावती निर्वाचन क्षेत्रातही लोकसभेच्या निवडणूकीत आमदारकीचीच चर्चा सुरू आहे.
0 Comments